सचिन वाझेच्या समोरच झाली मनसुख हिरन यांची हित्या
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली, त्या वेळी सचिन वाझेदेखील घटनास्थळी होते, अशी माहिती दहशतवादविरोधी पथकाच्या() तपासातून पुढे आली आहे. मनसुख यांच्या हत्या प्रकरणाचा दावा एटीएसने केला होता तसेच तपास अंतिम टप्प्यात असल्याचे एटीएसचे प्रमुख जयजितसिंग यांनी सांगितले होते. मनसुख याचा मोबाइल आणि सिमकार्डची मोठ्या हुशारीने वाझे यांनीच विल्हेवाट लावल्याचा संशय एटीएसच्या अधिकाऱ्यांना आहे. एनआयएकडे तपास जाण्यापूर्वी एटीएसने जमविलेल्या सबळ पुराव्यांवरून मनसुखची हत्या करण्यापूर्वी त्यांना बेशुद्ध करण्यात आले होते. त्यानंतर श्वास रोखून त्यांची हत्या करण्यात आली. जवळच एका कारमध्ये बसून वाझे हे सर्व पाहत होते. एटीएसने घटना घडली त्यावेळी मोबाइल लोकेशन तपासून यासंदर्भात सबळ पुरावे गोळा केले आहेत. एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसुखच्या चेहऱ्यावर बांधलेल्या पाच रुमालांमध्ये क्लोरोफॉर्म टाकण्यात आले होते. श्वास रोखून मारल्यानंतरही आरोपींना मनसुखच्या मृत्यूबाबत शंका होती. त्यामुळे त्यांनी त्याला खाडीत फेकून दिले. बारमध्ये छापा टाकल्याचे नाटक मनसुखची रात्री १०च्या सुमारास हत्या करण्यात आली. त्यानंतर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वाझे मुंबईत आले. त्यांनी मध्यरात्रीनंतर डोंगरी येथील टिप्सी बारमध्ये छापा टाकण्याचे नाटक केले. खरे वाटावे यासाठी त्यांनी पोलिस ठाण्यातील डायरीत तशी नोंदही केली. वाझे यांनी छापा टाकल्याचे पुरावे टिप्सी बारच्या सीसीटीव्हीमध्ये सापडले. लोकेशन बदलण्यासाठी शक्कल मनसुखकडे एक मोबाइल आणि त्यामध्ये दोन सिमकार्ड होती. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी त्या दोन्ही क्रमांकांचे सीडीआर काढले. हत्येनंतर शेवटचे लोकेशन वसई दिसावे यासाठी तिथे नेऊन मोबाइल काही वेळासाठी सुरू करून नंतर त्याची विल्हेवाट लावण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: