करोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
मुंबई: गेला, गेला असं वाटत असतानाच करोनाच्या साथरोगानं राज्यात पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. त्यामुळं प्रशासनाला कामाला लागण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी रविवारी दिले होते. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी महापालिकेचे आयुक्त व अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. (Uddhav Thackeray Meeting With BMC Officials) वाचा: 'एएनआय' वृत्तसंस्थेनं या संदर्भातील वृत्त दिलं आहे. मुख्यमंत्री हे महापालिका आयुक्त व अधिकाऱ्यांशी चर्चा करून मुंबईतील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. राज्याचे अर्थचक्र पुन्हा रुळावर आणण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं करोनाच्या पहिल्या टप्प्यात लावलेला लॉकडाऊन हळूहळू शिथिल केला होता. मात्र, लोकल ट्रेन जानेवारीच्या शेवटपर्यंत सुरू न झाल्यानं अर्थचक्र नीटसं रुळावर आलं नव्हतं. अखेर, जनतेची मागणी आणि कमी झालेली रुग्णसंख्या विचारात घेऊन सरकारनं १ फेब्रुवारीपासून मर्यादित वेळेत लोकल ट्रेन सुरू केली होती. वाचा: लोकल ट्रेन सुरू केल्यानंतर सुरुवातीच्या दोन आठवड्यांत रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसली नाही. मात्र, मागील आठवड्यापासून पुन्हा एकदा संसर्ग वाढू लागला आहे. लोकल प्रवाशांची बेजबाबदार वर्तणूक यासाठी जबाबदार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं लोकल ट्रेनवर पुन्हा निर्बंध येणार का, हे पाहावं लागणार आहे. तसंच, आजच्या बैठकीनंतर मुंबईबद्दल नेमका काय निर्णय घेतला जाणार याबद्दलही उत्सुकता आहे. जनतेनं नियम न पाळल्यास पुन्हा लॉकडाऊन करावं लागेल, असा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी आधीच दिला आहे. आजची बैठक त्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान, राज्यात सोमवारी ५,२१० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: