२०२० ठरले आठवे सर्वाधिक उष्ण वर्ष

January 05, 2021 0 Comments

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई सरलेल्या वर्षामध्ये नागरिकांनी टोकाचे हवामान अनुभवले. या घटनांमध्ये अनेक बळीही गेले. पूर, पाऊस, वीजा, मेघगर्जना, शीतलहर यामुळे १ हजार ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. भारतीय हवामान विभागाने सोमवारी सन २०२० साठीचा हवामानाचा आढावा घेणारा अहवाल जारी केला आहे. यामध्ये सरकारी नोंदी आणि माध्यमांमधील आकडेवारीच्या आधारे हा एकूण मृतांचा आकडा जाहीर केला आहे. सन २०२० हे आत्तापर्यंतचे सर्वाधिक आठवे असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे. गेल्या वर्षी भूपृष्ठावरील ०.२९ अंशांनी सरासरीपेक्षा अधिक होते. सन १९०१ पासून उपलब्ध नोंदींनुसार ही माहिती देण्यात आली आहे. मात्र हे वर्ष सन २०१६ पेक्षा कमी उष्ण होते. सन २०१६ मध्ये तापमान ०.७१ अंशांनी अधिक होते. मान्सूनपूर्व आणि मान्सूननंतरच्या सरासरी तापमानात वाढ झाल्याचे आढळले. हा बदल अनुक्रमे ०.४३ ते ०.५३ एवढा होता. त्यामुळे वर्षाच्या सरासरी तापमानातही वाढ झाली. हिवाळ्याच्या काळातही सरासरीपेक्षा तापमान ०.१४ अंशांनी अधिक नोंदवले गेले. आत्तापर्यंतच्या नोंदीनुसार सर्वाधिक उष्ण १५ वर्षांचा विचार केला तर यातील सुमारे १२ वर्षे ही २००६ ते २०२० या कालावधीत नागरिकांनी अनुभवली आहेत. २००१ ते २०१० आणि २०११ ते २०२० ही सर्वाधिक उष्ण दशके म्हणूनही नोंदली गेली आहेत. प्रती १०० वर्षाला ०.९९ अंशांनी कमाल तापमानात तर ०.२४ अंशांनी किमान तापमानात वाढ झाल्याचे दिसते. भारतीयांनी सन २०२० मध्ये पाच चक्रीवादळे भारतीय सागरी हद्दीमध्ये अनुभवली. यात अंफन, निवार, गती, निसर्ग, बुरेवी यांचा समावेश होता. निसर्ग आणि गती अरबी समुद्रात, तर अंफन, निवार आणि बुरेवी बंगालच्या उपसागरात निर्माण झाली. अंफनमुळे पश्चिम बंगालमध्ये ९० नागरिकांचा, तर चार हजार प्राण्यांचा मृत्यू ओढवला. निसर्गमुळे महाराष्ट्रातील चार नागरिक आणि सुमारे २ हजार प्राण्यांचा मृत्यू झाला. निवारमध्ये १२ नागरिक आणि १० हजाराहून अधिक प्राणी, बुरेवीमध्ये नऊ नागरिक आणि २०० प्राणी मृत्युमुखी पडले. या चक्रीवादळांमुळे मध्य भारत आणि दक्षिण भारतात सरासरीहून अधिक पाऊस पडला. यातही नागरिकांचे मोठे नुकसान झाले. हवामान बदलावर नियंत्रण आवश्यक वीज पडणे, मेघगर्जना, शीतलहर यामुळे गेल्या वर्षी बिहार आणि उत्तर प्रदेशातील सुमारे ३५० नागरिकांचा मृत्यू ओढवला. मुसळधार पाऊस आणि पूर यामुळे ६०० लोक देशभरात मृत्युमुखी पडले. वीज पडून देशातील सुमारे ८१५ नागरिकांचा बळी गेला. तर, जानेवारी २०२० मधील शीतलहरीमुळे १५०हून अधिक जणांचा मृत्यू झाला. या घटनांच्या पार्श्वभूमीवर हवामान बदलावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतःहून प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: