२० तासांनंतर सापडले चार चिमुकल्यांचे मृतदेह; नेमकं काय घडलं होतं?

सोलापूर: दक्षिण तालुक्यातील येथील एकाच कुटुंबातील ३ मुली आणि १ मुलगा अशा चार मुलांचा शनिवारी नदी पात्रात बुडून मृत्यू झाला होता. त्यातील चौघांचेही मृतदेह तब्बल २० तासांच्या शोधानंतर हाती लागले आहेत. मृतदेह पाहून आईवडील आणि नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. या घटनेमुळं संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. (Four Children From A Family Drowned In Solapur) वाचा: शनिवारी दुपारी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या समीक्षा शिवाजी तानवडे, अर्पिता शिवाजी तानवडे, आरती शिवानंद पारशेट्टी, विठ्ठल शिवानंद पारशेट्टी या चार मुलांचा बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर स्थानिक धाडसी तरुणांनी काल रात्री उशिरापर्यंत त्या मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा मोठा प्रवाह आणि रात्रीचा अंधार यामुळे शनिवारी या शोध कार्यात व्यत्यय आला. तेव्हा मंद्रुप पोलिसांनी रविवारी सकाळी पुन्हा स्थानिक भोई समाजाच्या मच्छीमार तरुणांना सोबत घेऊन शोधकार्य सुरू केले. पहिल्यांदा आरतीचा मृतदेह सापडला. नंतर समिक्षा आणि अर्पिता या दोघींचा एकमेकांच्या गळ्यात पडलेले मृतदेह सापडले. शेवटी दुपारी पावणे एकच्या दरम्यान विठ्ठलचा मृतदेह सापडला. महसूल विभागाचे प्रांतधिकारी दीपक शिंदे,पोलिस अधिकारी दत्तात्रय शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मंद्रुपच्या अप्पर तहसिलदार उज्ज्वला सोरटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. नितीन थेटे यांनी घटना घडल्यापासून घटनास्थळी राहून शोधमोहीम यशस्वी करण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली. एनडीआरएफचे पथक आणि सादेपूरचा मानसिंग भोई या धाडसी तरुणाने या शोधमोहिमेत पुढाकार घेऊन चारही मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: