नक्षल्यांसाठी मार्च महिना ठरला कर्दनकाळ

गडचिरोली: जिल्ह्याचं नाव ऐकताच डोळ्यासमोर चित्र येतं ते नक्षल कारवायांचं. सध्या दररोज चकमक, आत्मसमर्पण, बॅनरबाजी अश्या घटना समोर येत असून या महिन्याच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत घडलेल्या घटनांमध्ये नक्षल्यांचं मोठं नुकसान झालं असून मार्च महिना हा नक्षल्यांसाठी कर्दनकाळ ठरला आहे. छत्तीसगड-महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात अबुझमाड पहाडावर नक्षल विरोधी अभियान राबवितांना गडचिरोली पोलीस दलाच्या जवानांनी नक्षलवाद्यांचा शस्त्रांचा छोटा कारखाना उध्वस्त केला. पहिल्यांदाच नक्षल्यांचा घरात घुसून ही कारवाई करण्यात आली. नक्षली पळून गेले मात्र, सी-६० जवानांना अबुझमाड पहाडावर नक्षलवाद्यांचा शस्त्रांचा कारखाना उध्वस्त करण्यात यश मिळालं. अबुझमाडच्या यशानंतर सी-६० जवानांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. आत्मसमर्पण योजना, विविध चकमकीत नक्षल्यांचा खात्मा आणि हिंसाचाराच्या घटनांना कंटाळून नक्षलवाद्यांच्या प्लाटून ७च्या कमांडरसह एकूण ४ जहाल नक्षल्यांनी मंगळवारी २३ मार्च रोजी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्या सर्वांवर अनेक गुन्हे दाखल असून त्यांच्यावर राज्यशासनाने एकूण २२ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी शांततेचे प्रतीक असलेला पांढरा दुपट्टा आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. लगेच पुन्हा २९ मार्चला गडचिरोली पोलिसांच्या विशेष नक्षल विरोधी अभियान पथक सी-६०ने खोब्रामेंढा पहाडीवर अभियान राबवित असताना नक्षल नेता भास्कर सह पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घालून होळीच्या पर्वावर लाल यश संपादन केले.एकंदरीत गडचिरोली पोलिसांना मिळालेला खूप मोठा यश असून नक्षलयांसाठी मात्र, मार्च महिना कर्दनकाळच ठरला आहे. सदर काळ हा नक्षलवाद्यांचा प्रशिक्षणाचा असतो,त्यांचे प्रशिक्षण अत्यंत सुरक्षित ठिकाणी होते.त्याकरिता शेकडो एका ठिकाणी गोळा होतात.याच ठिकाणाहून मोठा घातपात व्युव्हरचना आखली जाते. मात्र,पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात सी-६० जवानांना मोठं यश मिळताना दिसत आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: