करोनाला हसण्यावारी नेऊ नका; अजितदादांनी फटकारले

म. टा. प्रतिनिधी, नगर 'करोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. करोनाला हसण्यावारी घेऊ नका. अजूनही करोनासंबंधी काळजी घेणे आवश्यक आहे. असे असले तरी अनेक जण याकडे दुर्लक्ष करीत आहेत. बघा, येथेही हे पठ्ठे बिनामास्कचे आले आहेत,' असे सांगून, मास्क न वापरणाऱ्यांना उपमुख्यमंत्री यांनी आपल्या खास शैलीत फटकारले. पवार शनिवारी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्या हस्ते राहुरी, नगर शहर व श्रीगोंदा तालुक्यात विविध कामांची भूमिपूजने आणि उद्घाटने करण्यात आली. राहुरी तालुक्यातील कार्यक्रमात त्यांनी करोनाच्या स्थितीबद्दल भाष्य केले. ते म्हणाले, 'करोना आणि त्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे सर्वांचेच हाल झाले. त्यातूनही मार्ग काढत राज्य सरकारने उपाययोजना केल्या. मात्र, या काळात आर्थिक विकासाचा दर खाली आला. अर्थसंकल्पात जे ठरविले, तेवढेही पैसे येत नव्हते. केंद्र सरकारकडे २५ हजार कोटी रुपये येणे बाकी आहेत. तरीही आपले महाविकास आघाडीचे सरकार वचन पाळणारे सरकार आहे. उपलब्ध पैशांत कामे सुरूच ठेवली. राज्य सरकारचा सर्वांत मोठा खर्च पगार आणि निवृत्ती वेतनावर होतो. दरमहा सुमारे १२ हजार कोटी रुपये यासाठी लागतात. त्यानंतर उरलेल्या पैशातून कामे करावी लागतात.' 'करोनाचे संकट अद्याप संपले नसून, करोनाला हसण्यावारी घेऊ नका. अनेक जण दुर्लक्ष करीत आहेत. येथेही हे बघा अनेक पठ्ठे बिनामास्कचे आले आहेत. ज्यांनी मास्क लावले आहेत, त्यातील अनेकांनी येथे वाटलेले मास्क लावल्याचे दिसून येत आहे. असे करू नका. ब्रिटनमध्ये करोनाची दुसरी लाट आली असून, परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या,' असे आवाहन पवार यांनी केले. राज्यात हाय अलर्ट दिल्लीत इस्रायली दूतावासाजवळ शुक्रवारी बॉम्बस्फोटाची घटना घडली. या पार्श्वभूमीवर राज्यात सुरक्षेच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या काळजीबाबत पवार यांनी पत्रकारांना माहिती दिली. 'महाराष्ट्रात सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घेण्यात आलेली आहे. मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात आवश्यक तिथे योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. राज्यातील संपूर्ण पोलिस खाते अलर्ट झाले आहे,' असे त्यांनी सांगितले.
from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times
0 Comments: