मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम; शिवसेना- भाजपमध्ये खडाजंगी

June 02, 2021 0 Comments

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी वॉर्डांची पुनर्रचना केली जाणार आहे. निवडणुकीला ९ महिने शिल्लक असले तरी या पुनर्रचनेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये आत्तापासूनच खडाजंगी सुरू झाली आहे. पालिकेत अधिकाधिक जागा निवडून आणण्यासाठी शिवसेना ३० वॉर्डांची फोडाफोडी करत असल्याचा आरोप भाजपचे आमदार आशीष शेलार यांनी केला आहे. त्यावर निवडणुकीआधीच भाजपच्या पायाखालची वाळू सरकली असून शिवसेनेचा भगवा पालिकेवर पुन्हा फडकणार असल्याच्या भीतीने शेलार हे बेताल वक्तव्य करत असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होत असून या निवडणुकीच्या प्रशासकीय प्रक्रियेच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोग व पालिकेच्या निवडणूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सोमवारी बैठक झाली. करोनाची तिसरी लाट आल्यास निवडणूक पुढे ढकलली जाणार, अशी चर्चा सुरू असताना निवडणूक आयोगाने तयारीचे निर्देश दिल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले आहे. 'निवडणुकीची चर्चा सुरू झाल्यापासून शिवसेनेची खलबते आणि कटकारस्थाने सुरू झाली आहेत. पराभवाच्या भीतीने पळवाटा शोधण्याचे काम शिवसेना करते आहे. ज्या ३० वॉर्डांमध्ये शिवसेना आणि काँग्रेसला आजन्म विजय मिळणार नाही तेथे वॉर्ड फोडाफोडीचे राजकारण सेनेने सुरू केले आहे. कायदा आणि करोनाचा विचार करुन निवडणुका घ्या. भाजप तयार आहे,' असे आव्हान शेलार यांनी दिले. 'करोनाची पहिली लाट आटोक्यात येत आहे असे दिसत असताना सेनेने पालिकेची मुदतपूर्व निवडणूक घेण्याचा पहिला डाव टाकला होता. मात्र दुसरी लाट आली आणि हा डाव फसला. २०१७ मध्ये प्रभाग पुनर्रचना घटनाबाह्य असल्याची चर्चा सुरू केली. भाजपने आपल्या फायद्याची प्रभागरचना केली, असा दावा करण्यात आला. मात्र वॉर्ड पुनर्रचना २०२१च्या जनगणनेच्या आधारावरच असल्याचे दिसून आले व सेनेचा हा प्रयत्न अभ्यास नसल्यामुळे फोल ठरला. त्यासाठी मुंबई पालिकेतून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना मोठ्या पगारावर घेण्यात आले होते,' असा दावाही शेलार यांनी केला. करोनाच्या तिसऱ्या लाटेचा फायदा घेत जनगणना करता येत नाही. नवीन मतदारनोंदणी करताना अधिक वेळ लागेल. त्यामुळे पालिकेला २ वर्षे मुदतवाढ देण्याचा प्रयत्न सेनेकडून सुरू आहे, असा आरोपही शेलार यांनी केला. निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव पाठवा निवडणूक आयोगाला पुढे करून दोन वर्षे निवडणुका पुढे ढकलत असाल तर त्या दोन वर्षांतील सर्व कंत्राटे, ठेके यांच्या मंजुरीचे विषय स्थायी समितीकडे न पाठवता निवडणूक आयोगाकडे पाठवा. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प २० हजार कोटींचा असून अशा अनेक प्रकल्पांना मंजुरी देणे बाकी आहे. त्यांच्या 'कट कमिशन'साठी ही कारस्थाने सुरू आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. भाजपनेच २०१७ मध्ये प्रभाग फोडले सेनेवरील आरोपांना महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिले आहे. शेलार यांच्या आरोपात काही तथ्य नाही. २०१७च्या पालिका निवडणुकीत मुंबई भाजपचे अध्यक्ष शेलार होते. त्यावेळी त्यांनी प्रभाग फोडून आपल्या नगरसेवकांची संख्या वाढवली. ते आता निसटून जात असल्याचे दिसल्यानंतर बेताल वक्तव्य केली जात आहेत. आम्ही निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून काम करत नाही. भाजपला वाटत असेल तर उद्याच निवडणुका घ्या, आम्हाला काहीच अडचण नाही. उद्धव ठाकरे हे देशातील प्रथम क्रमांकाचे मुख्यमंत्री ठरत असल्याने भाजपची पोटदुखी वाढली आहे. पालिकेवरचा भगवा यापुढेही कायम राहील, असा दावा महापौरांनी केला. पालिकेतील पक्षीय बलाबल शिवसेना ९७ भाजप ८३ काँग्रेस २९ राष्ट्रवादी ८ समाजवादी पक्ष ६ मनसे १ एमआयएम १ अभासे १ एका जागा जात प्रमाणपत्रावरून न्यायप्रविष्ट


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: