माझ्या 'त्या' वक्तव्याचा विपर्यास केला गेलाः जयंत पाटील
पंढरपूरः राज्यात करोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी मिनी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचं करोनासंदर्भातलं एक वक्तव्य चांगलंच गाजतंय. जयंत पाटील यांनी आता या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान जयंत पाटील यांनी 'तुमचे सर्वांचे चेहरे पाहून जगात करोना नाही असं मला वाटतंय, म्हणून मी ही मास्क काढून बोलतो,' असं वक्तव्य केलं होतं. जयंत पाटील यांच्या वक्तव्यानंतर आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं. आता मात्र, जयंत पाटील यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच, व्यासपीठावर विनामास्क नेते बसले होते म्हणून उपहासाने बोललो, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. 'करोना संपलेल्या अविर्भावात लोकं समोर बसली होती. चेहऱ्यावर कोणाच्याही मास्क नव्हता. करोनाचा संसर्ग वाढला आहे. म्हणून मी हे उपरोधानं बोललो,' असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी केलं आहे. दरम्यान, पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार तयारी केली आहे. भाजपचे नेते कल्याणराव काळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी जयंत पाटील यांची भेट घेतली असून काळे यांचा गट भगीरथ भालके यांचा प्रचार करणार असल्याचं बोललं जात आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: