'सरकारला लॉकडाउन करण्यास आवडत नाही; पण...'

April 04, 2021 0 Comments

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई संसर्ग रोखणे आणि जनतेच्या आरोग्याला प्राधान्य यावर लक्ष केंद्रित करणे आजच्या घडीला अत्यावश्यक असून, या लढ्यात माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. आपण सगळे एकजुटीने लढत आहोत ही भावना सर्वसामान्य जनतेत निर्माण व्हावी आणि त्यांच्या मनातली धास्ती जाऊन योग्य काळजी घेण्याच्या दृष्टीने जनजागृती होण्यास सहकार्य करावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री यांनी शनिवारी केले. मुख्यमंत्र्यांनी वृत्तपत्रांचे संपादक, मालक, वितरक यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत संपर्क साधला. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, सचिव सीताराम कुंटे, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी या वेळी संसर्ग रोखण्यासाठी प्रामुख्याने इतर काही पर्याय आहेत का ते सर्वांकडून जाणून घेतले व सूचना स्वीकारल्या. ठाकरे म्हणाले, 'आपल्याला कुणाचीही रोजीरोटी हिरावून घ्यायची नाही. मात्र, जीवाची काळजीही घ्यावीच लागणार. आपण वर्षभरापासून सातत्याने आरोग्याचे नियम पाळण्यास सांगतो आहोत. मधल्या काळात आपण ते पाळल्याने ही साथ आपण बऱ्यापैकी रोखू शकलो. विषाणूच्या नव्या अवतारामुळे आपल्यासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. सरकारला लॉकडाउन करण्यास आवडत नाही. ही लढाई एकट्या सरकारची नाही तर तुम्हा आम्हा सर्वांची आहे.' 'अशा वेळी सर्वांनी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांना साथ दिली पाहिजे, याचे राजकारण नको. आपण विविध सूचना दिल्यात त्या सरकार निश्चितपणे अंमलात आणण्यासंदर्भात विचार करील. करोनाशी लढताना भीतीचे वातावरण नको. एकमेकांची योग्य काळजी कशी घेता येईल, या दृष्टीने समाजात जागृती निर्माण झाली पाहिजे आणि त्या कामी माध्यमांनी सहकार्य करावे,' असेही ते म्हणाले. 'ऑक्सिजन उत्पादन वैद्यकीय कारणांसाठी कसे राखून ठेवता येईल, खासगी व बंधपत्र-करार स्वरूपाने डॉक्टरांच्या सेवा कशा उपयोगात आणता येतील, त्याचाही विचार करीत आहोत. जनतेचे हित पाहूनच सरकारने भविष्यात काही निर्णय घेतल्यास माध्यमांनीदेखील त्यामागील हेतू पाहावा आणि वस्तुस्थिती मांडावी,' असे आवाहनही त्यांनी केले. जनतेशी संवादाच्या सूचना या बैठकीत लोकांची प्रतिरोधक शक्ती वाढविण्यासाठी उपाय, तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त सुयोग्य वापर, टेलीमेडिसिन, सार्वजनिक वाहतुकीचे व्यवस्थापन, कामाच्या वेळांची विभागणी, स्थानिक पातळीवर नियंत्रणाला प्राधान्य, दुकानदार, विक्रेते यांच्या चाचण्या करून त्यांना विक्रीची परवानगी, कोव्हिड केंद्रांसंदर्भातील धास्ती कमी करणे, वारंवार जनतेशी संवाद साधणे अशा विविध सूचनाही करण्यात आल्या.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: