युपीएच्या नेतृत्वावरुन राजकारण तापलं; काँग्रेसनं दिला राऊतांना 'हा' सल्ला
मुंबई: युपीएच्या अध्यक्षपदावरुन राज्यात पुन्हा वातावरण तापलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांनी युपीएचं नेतृत्व करावं, असं म्हटलं होतं. राऊतांच्या या विधानावर काँग्रेस नेते नाराज असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही राऊतांच्या या विधानावर आक्षेप घेतला आहे. देशात अनेक घडामोडी घडत आहेत अशावेळी युपीएचं नेतृत्व काँग्रेसबाहेरील नेत्यानं करावं ही अनेक राज्यातील प्रादेशिक पक्षांची मागणी आहे. आज युपीए अंत्यत विकलांग अवस्थेत आहे. युपीएची ताकद कमी झाली असून युपीएचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करावं, असं राऊत म्हणाले होते. यावर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी संजय राऊत हे शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का?; असा सवाल केला आहे. नाना पटोले मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. 'शिवसेना ही युपीएची सदस्य नाही. मग त्याबाबत चर्चा करण्याचा किंवा मत मांडण्याचा त्यांना अधिकारच नाही. त्यात नाराजीचा काय भाग आला. तसंच, संजय राऊत शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का, असा प्रश्न आम्ही मुख्यमंत्र्यांना विचारला होता. आता त्यावर काय उत्तर द्यायचं हे ते ठरवतील,' असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. तसंच, 'युपीएचं नेतृत्व कोणी करावं हे युपीएच्या सदस्यांनी ठरवलं आहे. त्यामुळं ज्या गोष्टीत त्यांचा काही संबंध नाही तिथं त्यांनी चर्चा करु नये,' असा सल्ला नाना पटोले यांनी दिला आहे. राज्यात ज्या घडामोडी घडत आहेत. खोटे आरोप लावणाऱ्या लोकांचं राज्यपाल ऐकत असतील. तो त्यांचा प्रश्न आहे. पण ते कसं चुकीचं आहे भाजपच्या नेत्यांनी लावलेले आरोप कसे खोटे आहेत. ही सगळी माहिती घेऊन आम्ही आज महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांच्या भेटीसाठी जाणार होते. तसं, पत्रही मुख्यमंत्र्यांना पाठवलं होतं. ते वेळ देतील तेव्हा आम्ही जाऊ, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: