राज्यात आजपासून 'नाइट कर्फ्यू'; नियम मोडणाऱ्यांना पोलीसांनी केलं अलर्ट
मुंबईः राज्यात करोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेत राज्य सरकारने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. वाढता संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात आज रात्रीपासून जमावबंदीच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी ही नागरिकांना अलर्ट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी राज्यातील करोना स्थितीचा आढावा घेऊन रविवारपासून लागू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत जमावबंदीची वेळ असेल, असं आदेशात म्हटलं आहे. तसंच, नागरिकांनी या आदेशाचं पालन करावं यासाठी महाराष्ट्र पोलिसांनीही आवाहन केलं आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट करण्यात आलं आहे. २८ मार्च २०२१ पासून संपूर्ण राज्यात नाइट कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. करोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असं ट्वीट महाराष्ट्र पोलीसांनी केलं आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून लॉकडाऊन वाढवण्यासोबतच जमावबंदीचा आदेशही जारी करण्यात आला आहे. हा आदेश १५ एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे. रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत अशी जमावबंदीची वेळ असेल. या वेळेत पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. तसे झाल्यास प्रत्येकी १ हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: