मुंबईसह इतर महापालिका निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता

March 01, 2021 0 Comments

म. टा. प्रतिनिधी, मुंबई महाराष्ट्रात बाधित रुग्णांची संख्या वाढत असून, करोना साथीचा प्रादुर्भाव अजूनही कायम असल्यामुळे औरंगाबाद, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, कोल्हापूर आणि वसई विरार महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. परिणामी करोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका न झालेल्या नागरी स्थानिक संस्थांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकांना आणखी मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या रविवारी मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यातील या पाच महत्त्वाच्या महापालिकांची आणि राज्यातील बहुतांश नगरपरिषदांचा मुदत संपुष्टात आली आहे. पण मतदारयाद्यातील सुधारणा व हरकती मोठ्या प्रमाणात आहेत. त्या तक्रारींचा निपटारा करणे करोनाच्या साथकाळात प्रशासनाला शक्य होणार नाही. तसेच प्रभाग रचनेच्या प्रश्नावरुन औरंगाबाद महापालिका तर गावे वगळण्याच्या प्रश्नावर कल्याण डोंबिवली आणि वसई विरार महापालिकेचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या पाच महापालिकांच्या अंतिम मतदार याद्या एक मार्च २०२१ रोजी प्रसिद्ध होणे अपेक्षित होते. ते काम न झाल्यामुळे याठिकाणच्या महापालिकेतील प्र्रशासकांना मुदतवाढ देण्याचा नगरविकास विभागाचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाने संमत केल्याची सूत्रांची माहिती आहे. राज्यात वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर निवडणुका न झालेल्या नागरी स्थानिक संस्थांमध्ये नियुक्त प्रशासकांना आणखी मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका कायदा, महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी कायदा १९६५मध्ये सुधारणा करण्यात येईल, असा निर्णय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यात करोनाचा प्रार्दुभाव असल्याने मुदत संपलेल्या आणि निवडणूक न झालेल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३० एप्रिल २०२१पर्यंत प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु करोनाचा प्रादुर्भाव अजूनही कायम आहे. त्यामुळे प्रशासक नियुक्त काळात निवडणूका घेणे शक्य होणार नाही, असे राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे. तसेच प्रशासकांना मुदतवाढ देण्याची विनंती निवडणूक आयोगाने केली आहे. त्यानुसार महाराष्ट्र महानगरपालिका कायदा, महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी कायदा १९६५मध्ये सुधारीत तरतूद समाविष्ट करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. तसेच यासंबंधीच्या कायद्यातील प्रस्तावित सुधारणेसाठी आज, सोमवारपासून मुंबईत सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुधारणा विधेयक उभय सभागृहात सादर करण्यास देखील राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली असल्याचे सांगण्यात आले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: