...तर मुंबईतही लॉकडाउन; पालकमंत्र्यांनी दिली माहिती
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई अमरावतीमध्ये लॉकडाउन करण्यात आले. काही जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लावली गेली आहे. त्याच पर्श्वभूमीवर रुग्ण वाढले तर लॉकडाउन होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया मुंबईचे पालकमंत्री यांनी मुंबईतील लॉकडाउनच्या प्रश्नावर बोलताना दिली. संसर्ग रोखण्यासाठी विशेष लक्ष द्यावे लागेल, असेही ते म्हणाले. मुंबईतील करोनाबाधितांचा आकडा दररोज वाढत असल्याने मुंबईची लाइफलाइन मानली जाणारी लोकल पुन्हा बंद होईल का या विचाराने मुंबईकरांची धाकधूक वाढली आहे. त्याबाबत अस्लम शेख यांना विचारले असता त्यांनी सूचक वक्तव्य केले. लोकल बंद होऊ नयेत, तशी परिस्थिती येऊ नये म्हणून आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला आहे. आवाहन करून लोक ऐकत नसतील तर कारवाई होईल. हॉटेल, नाइट क्लबवर कारवाई सुरू आहे. लॉकडाउन नको असेल तर मुंबईकरांनी जबाबदारीने वागले पाहिजे. लॉकडाउन लावण्याची वेळ येऊ नये यासाठीच हा प्रयत्न आहे, असे अस्लम शेख यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला होता. रुग्णसंख्या कमी झाली नाही तर लोकलची संख्या कमी करावी का, बस रूट बदलावा का, खाऊ गल्ली बंद करायची का, हॉटेलची वेळ तसेच सार्वजनिक ठिकाणी काय कारवाई करता येईल, यावर मुख्यमंत्र्यासोबतच्या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती अस्लम शेख यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: