वसुलीसाठी वीज तोडली, शेतकऱ्यांनी कंपनीचे कार्यालय गाठलं अन...
म. टा. प्रतिनिधी, नगर: कृषी पंपाची वीज बिल वसुलीसाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडले जात आहे तर कोठे डीपीच बंद केला आहे. पारनेर तालुक्यातील भाळवणी परिसरात मात्र या कारवाईमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी थेट वीज कंपनीचे कार्यालय गाठले. तेथे चर्चा होऊन यशस्वी तोडगा काढण्यात आला. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालीच हे आंदोलन झाले. सध्या घरगुती आणि कृषी पंपाच्या वीज बिलांच्या वसुलीचा प्रश्न गंभीर बनला आहे. सक्ती करणार नाही, असे सरकारक़डून सांगण्यात येत असले तरी कंपनीचे अधिकारी वेगवेगळ्या प्रकारे वसुलीसाठी दबाव आणत आहेत. त्यातूनच डीपी बंद करण्याचे प्रकार सुरू आहेत. भाळवणीतही शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. कृषीपंपाचे वीज कनेक्शन पुन्हा जोडावे या मागणीसाठी भाळवणी परिसरातील शेतकऱ्यांनी थेट येथील वीज उपकेंद्र गाठले. वाचाः महावितरण कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता भाळवणी, ढवळपुरी परिसरातील गावातील थकीत कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. तो पुन्हा सुरळीत करावा या मागणीसाठी उद्योजक सुरेश धुरपते, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकले यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील गावातील शेतकऱ्यांनी भाळवणी येथील उपकेंद्रावर जावून वीज कनेक्शन पुन्हा जोडण्याची मागणी केली. वाचाः यावेळी धुरपते यांनी वीज अधिकाऱ्यांना धारेवर धरीत आधी वीज बिले द्या मगच वीज पंपाच्या अश्वशक्तीप्रमाणे प्रमाणे बिलाची वसुली करावी, शेतकर्यांसाठी असणारी कृषी संजीवनी योजना समजावून सांगून त्याप्रमाणे वसुलीची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली. वाचाः थकीत वीज बिलासाठी योग्य प्रमाणात हप्ते पाडून देण्याची मागणी केली. हा तोडगा सर्वानुमते मान्य करण्यात आला. तोडण्यात आलेली वीज कनेक्शन पुन्हा जोडण्यात येतील. शेतकऱ्यांनी प्रति अश्वशक्ती क्षमतेच्या पंपासाठी एक हजार रुपये तातडीने भरावेत, असा तोडगा काढण्यात आला. त्यामुळे वीज जोडणी आणि वसुलीचा मार्ग मोकळा झाला.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: