कल्याणमधून १० दिवसांपूर्वी बेपत्ता झाला होता तरूण उद्योजक; साताऱ्यात सापडला मृतदेह
ठाणे: कल्याणमधून १० दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरूण उद्योजकाचा मृतदेह साताऱ्यातील वाईत सापडला. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. संदीप कदम (वय ३६) यांची कल्याणमध्ये ट्रव्हल एजन्सी आहे. तीन दिवसांपूर्वी साताऱ्यातील मांढरदेवी मंदिराजवळ दरीत त्यांचा मृतदेह सापडला, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यांची केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. कदम हे २० डिसेंबरला बेपत्ता झाले होते. घटनेच्या दिवशी काही जणांसोबत ते गेले होते. त्यानंतर त्यांचा काहीच ठावठिकाणा नव्हता. २९ डिसेंबर रोजी वाईत मांढरदेवी मंदिरापासून जवळच असलेल्या दरीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. चेहऱ्यावर जखमा होत्या. याबाबत स्थानिकांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी तपास सुरू केला. राज्यातील अनेक पोलीस ठाण्यात या वर्णनाची व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार आहे का, याबाबत विचारणा केली. त्याचदरम्यान, कल्याणमध्ये अशाच वर्णनाची व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली गेल्याची माहिती मिळाली. कदम यांचे अपहरण केल्यानंतर त्यांची हत्या केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी कलम ३०२, कलम २०१, ३६४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, तालुका पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या हत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: