जुळ्या मुली झाल्या; सासरच्यांच्या टोमण्यांना वैतागून मातेने उचलले टोकाचे पाऊल
वसई: २५ वर्षीय महिलेने आपल्या जुळ्या मुलींपैकी एकीची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वसईत बुधवारी ही घटना घडली. मुलगा झाला नाही म्हणून सासरच्या मंडळींकडून टोमणे ऐकवले जात होते. या त्रासाला वैतागून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तिने पोलिसांना सांगितले. महिलेच्या म्हणण्यानुसार, ४५ दिवसांपूर्वी तिने जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र, त्यांचा सांभाळ करत असताना, सासरच्यांकडून कोणतीही मदत होत नव्हती. इतकेच नाही तर, मुलीची तब्येत बरी नव्हती. ती सारखी रडत होती. त्यामुळे हे पाऊल उचलले. पोलिसांनी या महिलेला अटक केली असून, तिच्याविरोधात वसईगाव पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने ४५ दिवसांपूर्वी जुळ्या मुलींना जन्म दिला. बुधवारी सकाळी त्यातील एक मुलगी घरातून बेपत्ता झाली. तिच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र, कुठेही सापडली नाही. अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तिच्या अपहरणाची तक्रार नोंदवली. सकाळी पावणेबाराच्या सुमारास मुलीचा शोध घेत असतानाच, महिलेने केलेल्या गुन्ह्याची कबुली पोलिसांसमोर दिली. मुलीला पाण्याच्या टाकीत बुडवल्याचे तिने सांगितले. हे ऐकून सगळ्यांना धक्काच बसला. पोलिसांनी मुलीला टाकीतून बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. दाखल करण्यापूर्वीच मुलीचा मृत्यू झाला होता. मुलीचा मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आला. जुळ्या मुली झाल्यामुळे सासरची मंडळी टोमणे मारत होती. तिच्या जावेलाही दोन मुली होत्या. त्यामुळे मला मुलगा व्हावा असे त्यांचे म्हणणे होते. दोन मुली आणि महिला घरी होत्या. रडणाऱ्या मुलीला उचलले आणि पाण्याच्या टाकीत टाकले. दुसरी मुलगी अंथरुणातच होती. त्यानंतर एक मुलगी बेपत्ता झाली असल्याची आरडाओरड सुरू केली. सासू, जावेने आणि शेजाऱ्यांनी मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याचवेळी तिचा पती आणि दीर हे दोघे घरात नव्हते. दरम्यान, पोलिसांनी महिलेला अटक केली असून, तिला वसई कोर्टात हजर केले. तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: