करोनामृतांच्या संख्येत विक्रमी घट; पण 'हा' आकडा चिंता वाढवणारा
मुंबईः गेल्या २४ तासांत राज्यात ३५ करोना बाधितांचा मृत्यू झाला असून ३ हजार २८२ नवीन रुग्ण आज राज्यात सापडले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आज केंद्राकडून सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लशींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिल्यानंतर एकीकडे करोनाच्या लढ्याला यश येत असतानाच एकीकडे राज्यात पुन्हा करोनाबाधितांच्या संख्येनं उसळी घेतल्याचं चित्र आहे. दिवसभरात ३ हजार २८२ नवीन रुग्णांचे निदान झालं असून एकूण रुग्णांची संख्या १९ लाख ४२ हजार १३६ इतकी पोहोचली आहे. आज २ हजार ०६४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, त्यामुळं राज्यात आजपर्यंत एकूण १८,३६,९९९ बाधित रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.५९ % एवढे झाले आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या मात्र स्थिर आहे. सध्या राज्यात ५४ हजार ३१७ रुग्ण उपचार घेत आहेत. करोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच करोना मृतांचा आकडा मात्र घटताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत ३५ रुग्णांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे. करोनामुळं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४९ हजार ६६६ इतकी झाली आहे. तर, राज्यातील मृत्यूदर २.५६% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२९,५८,५०२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,४२,१३६ (१४.९९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,४७,९७२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,९६९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: