आदिवासींची परवड थांबता थांबेना ! पिंपळगाव तलावाचे पाणी शिरले पालांमध्ये
https://ift.tt/iNz1g3Xनगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी तलाव परिसरात राहणार्या आदिवासी समाजाची परवड थांबता थांबेना, असे चित्र सध्या दिसून येत आहे. आदिवासी समाजाच्या पालांमध्ये तलावाचे पाणी शिरले असून, विषारी सापांच्या सानिध्यात चिमुकले जीव मुठीत धरून जगत आहेत. येथील आदिवासींचे पुनर्वसन करण्याची मागणी करण्यात येत आहे. पिंपळगाव माळवी तलावाच्या कडेला सुमारे 200 कुटुंब वास्तव्यास आहेत. येथील 700 एकर क्षेत्रावर महापालिकेच्या नावाची नोंद करण्यात आली आहे. सदर क्षेत्र आदिवासी समाजाच्या नावावर होण्यासाठी आदिवासी समाज अनेक वर्षे शासन दरबारी लढला. पण पदरी निराशाच आली. येथील आदिवासी समाजाला कोणत्याही मूलभूत सुविधा पुरविण्यात येत नाहीत.
जागाच नावावर नसल्याने वीज नाही, घरकुल नाही, रस्ते नाही, पाणी नाही, शाळ ा नाही अन् असलेल्या पालामध्ये तलावाचे पाणीच पाणी झाले आहे. सीना व खारोळी नदीच्या पुरात जंगलातील अनेक विषारी साप तलावात वाहून आलेले आहेत. या सापांचे वास्तव्य देखील तलावाच्या कडेला असणार्या आदिवासी समाजाच्या पालाशेजारीच आढळून येत आहे. त्यामुळे येथील चिमुकले तसेच सर्वच आदिवासी समाज जीव मुठीत धरून जीवन जगत आहे.
मासेमारी व तलावाच्या कडेला थोडीफार शेती करून उपजीविका भागविणार्या या समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. येथील अनेक लोकांकडे जातीचे दाखले नाहीत. तलावातील आदिवासी समाज जेऊर, पिंपळगाव माळवी व धनगरवाडी या तीन ग्रामपंचायतीच्या हद्दीत विखुरला गेला आहे. त्यामुळे त्यांची जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही.
दिल्ली येथील अनुसूचित जनजाती आयोगाने तलावात येऊन स्थानिक अधिकार्यांचा समक्ष येथील परिस्थितीची पाहणी केली होती. त्यावेळी येथील विदारक चित्र पाहून अनुसूचित जनजाती आयोगाचे पदाधिकारी देखील भावुक झाले होते. येथे तात्काळ रस्ते, पाणी, वीज, घरकुल, शाळा या मूलभूत सुविधा देण्याबाबत सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. परंतु, त्याची अंमलबजावणी झालीच नाही. येथील आदिवासी समाजाचे जीवन हे संपूर्णतः तलावावर अवलंबून आहे.
तलावात मासेमारी व कडेला शेती करून उपजीविका चालणार्या या समाजाचे भविष्य काय असा प्रश्न पडतो. येथील आदिवासी समाजाचे पुनर्वसन करण्याची मागणी एकलव्य संघटनेचे युवक तालुकाध्यक्ष आकाश गायकवाड, शाखाध्यक्ष नितीन वाघ, उपाध्यक्ष अनिल माळी, सुनील वाघ, अनिल वाघ, गोरख माळी, गोरख बर्डे यांच्यासह आदिवासी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
आश्वासनांची खैरात, कार्यवाही शून्ये
तलावातील आदिवासी समाजाची विदारक परिस्थिती पाहण्यासाठी विविध अधिकारी, पदाधिकारी येतात मोठमोठी आश्वासने देतात. परंतु, प्रत्यक्षात काहीही कार्यवाही होत नाही. आदिवासींच्या पालांनी पाणी शिरले असून, विषारी सापांचा वावर आहे. येथील समाजाचे पुनर्वसन न झाल्यास एकलव्य संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा तालुकाध्यक्ष आकाश गायकवाड यांनी दिला आहे.
The post आदिवासींची परवड थांबता थांबेना ! पिंपळगाव तलावाचे पाणी शिरले पालांमध्ये appeared first on पुढारी.
from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/XmD47Ja
via IFTTT
0 Comments: