‘मुख्याध्यापकांनी गुणवत्ता वाढवावी’ : महसूलमंत्री विखे पाटील
https://ift.tt/sfTvAY4नगर : पुढारी वृत्तसेवा : कोचींग क्लासेसचे पेव फुटले आहे. वेगळा पॅटर्न निर्माण करायचा, त्या नावाखाली धंदा सुरू करायचा. कोचिंग क्लासमध्ये हजारो रुपयांच्या फीची आकारणी सुरू आहे. ही सामान्य माणसांची लूट आहे. शासन निर्णयामध्ये यावर बंधने येतीलही, पण माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करून गुणवत्ता वाढविल्यास कोचींगकडे जाण्याची गरज उरणार नाही, असे प्रतिपादन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे 61 वे राज्यस्तरीय शैक्षणिक अधिवेशन नगर येथे रविवारपासून सुरू झाले. त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. महेंद्र गणपुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, मुख्याध्यापक संघाचे राज्याध्यक्ष जे.के पाटील, सचिव शांताराम पोखरकर, स्वागताध्यक्ष सुनील पंडीत, शिवाजीराव काकडे, प्रा.भानुदास बेरड, जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंग, संघाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब कळसकर, शिक्षणाधिकारी अशोक कडूस, वसंत लोढा, ज्ञानेश्वर म्हात्रे, आर.डी.निकम, मधुकर नाईक यांच्यासह राज्यातील मुख्याध्यापक उपस्थित होते.
मंत्री विखे म्हणाले, उद्याच्या पिढीला घडवून ज्ञानसंपन्न करण्याची जबाबदारी मुख्याध्यापक निभावत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 35 वर्षांनी नवे शैक्षणिक धोरण देशात आणले आहे. हे नवे धोरण स्वीकारणे गरजेचे आहे. कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धत स्वीकारावी लागली. यासाठी शिक्षकांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. आता डिजिटल जमाना आहे. विद्यार्थी आता शाळा महाविद्यालयांवर अवलंबून नाहीत. खाजगी कोचिंग क्लासेसकडे तो वळला आहे. पालकाला कोचिंग क्लासमध्ये मुलाचे भवितव्य दिसते आहे. या परिस्थितीला कोण जबाबदार आहे ? शाळा महाविद्यालयामध्ये सर्व सुविधा उपलब्ध असताना का तेथे दर्जेदार शिक्षण मिळत नाही, हे अपयश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिवाजीराव कर्डिले म्हणाले, मंत्री विखे शिक्षणमंत्री असताना शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडवले आहेत. अनेक विनाअनुदानित विद्यालयाने अनुदानित केले. त्यामुळे शिक्षकांना शाळेत नोकरी मिळाल्याने त्यांचे ‘दोनाचे चार हात’ होत आहेत. मंत्री विखेंना शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या प्रश्नांची जान असल्याने ते सर्व प्रश्न नक्की सोडवतील, अशी अपेक्षा कर्डिले यांनी व्यक्त केली.
जे.के पाटील म्हणाले, मुख्याध्यापाकला कायम द्रोपदीची भूमिका बजावत शासन, संस्थाचालक, पालक, अधिकारी व विद्यार्थी या पाची घटकांना तोंड द्यावे लागते. शिक्षकांच्या महत्वाच्या प्रश्नावर शासनाने त्वरित निर्णय घ्यावा.
प्रास्ताविकात संयोजक सुनील पंडीत यांनी शाळांचे, शिक्षकांचे व मुख्याध्यापकांचे अनेक प्रलंबित प्रश्नावर प्रकाश टाकून ते त्वरित सोडवण्याची मागणी मंत्री विखे यांच्याकडे केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विणा दिघे यांनी केले तर राज्य सचिव शांताराम पोखरकर यांनी आभार मानले. अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी महानगर अध्यक्ष ज्ञानदेव बेरड, उपाध्यक्ष बाळासाहेब सूर्यवंशी, मिथुन डोंगरे, निवृत्ती इले, राजेंद्र वाघ, राजेंद्र चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.
The post ‘मुख्याध्यापकांनी गुणवत्ता वाढवावी’ : महसूलमंत्री विखे पाटील appeared first on पुढारी.
from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/ESHogyZ
via IFTTT
0 Comments: