भगवान बाबा दर्शनाने ओबीसी चळवळ सुरु : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
https://ift.tt/WpXMm5nखरवंडी कासार : पुढारी वृत्तसेवा : भगवानगड हा समाज सुधारकांचा आहे. ओबीसी समाजासाठी भगवान बाबांचे मोठे काम आहे. राज्य आणि देशात ओबीसी चळवळ उभी करण्यासाठी भगवानगडापासून सुरुवात करावी लागणार. म्हणून संत भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन ही चळवळ प्रभावी करणार, असा निर्धार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता आल्यावर पहिले भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले जाईल, असेही पटोले म्हणाले. शेकडो कार्यकर्त्यांसह पटोले भगवान गडावर आले असता माध्यमांशी बोलत होते. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष नासीर शेख, उपाध्यक्ष आनंद सानप, जालिंदर काटे, प्रकाश शेलार, आकाश काळोखे, मुन्ना खलिफा, राहुल ढाकणे, गणेश दिनकर, सुनील दौंड, बाबासाहेब वाघ, सुभाष भाबड, पोपट बडे, वसंत खेडकर यांनी काँग्रेस पदाधिकार्यांचे स्वागत केले.
पटोले म्हणाले की, संत भगवान बाबांनी बहुजनांच्या उत्थानासाठी काम केले असून त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी मी भगवान गडावर आलो आहे. लोकशाहीच्या मार्गाने मला मुख्यमंत्रीपद मिळाले तर संत भगवान बाबांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचे काम करायचे आहे. बाबांची शिकवण आमच्या पाठीशी आहे. बहुजनांच्या उत्थानाची प्रेरणा घेण्यासाठी मी भगवानगडावर आलो. पंकजा मुंडे यांचा सावरगाव येथे झालेला दसरा मेळावा आणि मी गडावर येणे हा फक्त योगायोग आहे. या मागे कोणतेही राजकारण नाही.
पटोले म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात अतिशय वाईट राजकीय परिस्थिती झाली आहे. सन 2014 पासून केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून आणि आता सन 2019 पासूनची भयानक परिस्थिती देशात आहे. राज्याला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. कोणी खोके कोणी बोके सांगते. शाहू, फुले, आंबेडकर आणि भगवान बाबांच्या पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र पुन्हा एकदा बनवावा, यासाठी बाबांना साकडे घातले आहे.
भाजपला सत्तेची गुर्मी आली आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहूल गांधी यांनी व काँग्रेस पक्षाच्या धोरणांची खिल्ली उडविण्याचे काम भाजपची मंडळी करत आहे. तिरंगा व संविधान वाचवण्यासाठी राहूल गांधी पदयात्रेच्या माध्यमातून लढत आहेत.
नाशिक येथील अपघात रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या नादात झाला असून या अपघातातील मृत्यूचे वाटेकरी हे राज्य सरकार असल्याची टीका पटोले यांनी केली. राज्यातील मोठे उद्योग गुजरातला गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात आम्ही मोदी, शहांचे हस्तक आहोत. पुरोगामी महाराष्ट्राला हे मान्य होऊ शकत नाही. दिल्लीत बसलेल्या अत्याचारी व्यवस्थेचा नायनाट झाला पाहिजे, असा आशीर्वाद भगवान बाबांकडे मागितला आहे.
आमदार राजेश राठोड, भानुदास माळी, राजेंद्र राख, अशोक पाटील, कल्याण काळे, इसुफ लीडर, राजेसाहेब देशमुख, केशर मोटवानी, सुशीला मोराळे, शुभांगी शेरकर, दादासाहेब मुंडे, बाळासाहेब सानप आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The post भगवान बाबा दर्शनाने ओबीसी चळवळ सुरु : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले appeared first on पुढारी.
from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/RkAPMHS
via IFTTT
0 Comments: