'या' प्रभागात रुग्णसंख्येत उतार; पालिका शोधणार वैद्यकीय कारण
म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईच्या काही प्रभागांमध्ये करोना रुग्णांची संख्या कमी असून, त्यामागील नेमक्या वैद्यकीय कारणांचे विश्लेषण करण्यासाठी पालिकेने या प्रभागामध्ये विशेष अभ्यास करण्याचे ठरवले आहे. सी, एल, एम (पूर्व), बी प्रभागामध्ये मुंबईच्या इतर प्रभागापेक्षा रुग्णसंख्येचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. यामागील नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी या अभ्यासाचे प्रयोजन असल्याचे पालिकेच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगिले. यासंदर्भात सध्या नियोजन सुरू आहे. काही संस्थांचीही यासाठी मदत घेतली जाणार आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार ३१ मेपर्यंत मुंबईमध्ये ७,०५,५७५ रुग्णसंख्येची नोंद करण्यात आली असून, एकूण ६२,७१,७४३ चाचण्या झाल्या आहेत. यातील पॉझिटिव्ह तपासण्यांचे प्रमाण ११.२५ टक्के आहे. करोना संसर्गासाठी १३,८४२ संपर्कातील व्यक्तींना शोधण्यात आले असून, त्यापैकी ९१४२ हे हायरिस्क संपर्काच्या क्षेत्रामध्ये मोडतात. तर ४७०० हे लो-रिस्क संपर्क आहेत. एल वॉर्डमध्ये आता केवळ तीन प्रतिबंधित क्षेत्रे राहिली आहेत. हे प्रमाण पूर्वी आठ ते सोळा इतके होते. तर ए, बी, सी, एफ नॉर्थ, एफ साऊथ, जी नॉर्थमध्ये शून्य प्रतिबंधात्मक क्षेत्रांची नोंद झाल्याचे दिसून येते. एल वॉर्डमध्ये २५०६५ रुग्णसंख्येची नोंद करण्यात आली आहे. शून्य ते पंधरा हजार रुग्णसंख्या असलेल्या प्रभागामध्ये ए, एफ साऊथ, ई, एम ईस्ट, आर नॉर्थ, जी साऊथ, एम वेस्ट, एम ईस्ट, एल, एफ नॉर्थ, एच वेस्ट, जी नॉर्थ या प्रभागांची नोंद करण्यात आली आहे. एल, डी, आरएस, एच-वेस्ट, पी-साऊथ, के-ईस्ट, एच-इस्ट, जी-साऊथ, टी, एफ-नॉर्थ, एम-ईस्ट, ई, बी, एम-वेस्ट या प्रभागांमध्ये ०.१२ ते ०.१६ टक्के रुग्णसंख्येची साप्ताहिक वाढ नोंदवण्यात आली आहे. भायखळा, परळ, मरिन लाइन्स, घाटकोपर, चेंबूर येथे रुग्णदुपटीचा दर साडेपाचशे दिवसांपेक्षा अधिक नोंदवण्यात आला आहे. पालिकेच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार काही प्रभागांमध्ये रुग्णसंख्या दुसऱ्या लाटेमध्ये अधिक प्रमाणात वाढली नाही किंवा काही प्रभागामध्ये सुरुवातीला हे प्रमाण अधिक दिसले त्यानंतर हा वेग खाली आला. याची नेमकी कारणे कोणती आहेत हे अभ्यासानंतर कळेल. हर्ड इम्युनिटी, लसीकरण तसेच लॉकडाउनच्या निर्बंधामुळे हे प्रमाण कमी होण्यास मदत झाली का, याचा एकत्रित अभ्यास करणे त्यामुळे शक्य होणार आहे. तिसरी लाट जर तीव्र स्वरूपाची असेल तर त्याचे वैद्यकीय व्यवस्थापन आणि प्रशासकीय नियोजन करण्यासाटी मदत होईल, असेही ते म्हणाले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: