दारुच्या अड्ड्यावर धाड टाकायला गेलेल्या पोलिसांवर जमावाचा प्राणघातक हल्ला
सोलापूर: माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे पारधी वस्तीत हातभट्टी दारुच्या अड्ड्यावर धाड टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर वस्तीतील पारध्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यात वेळापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान खारतोडे गंभीर जखमी झाले आहेत, तर इतर दोन पोलिस कर्मचारीही जखमी झाले आहेत. ही घटना काल शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. वेळापूर येथील पालखी मैदानालगत पारधी समाजाची वस्ती आहे. त्याठिकाणी हातभट्टी दारूचा अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याबाबत माहिती असूनही पोलिसांनी या वस्तीत आतापर्यंत मोठी कारवाई केली नव्हती. पण करोना काळात सर्व बंद असताना दारु अड्डा सुरुचं असल्याचे समजल्यावर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कार्यालयाच्या बाजूला पारधी वस्तीतल्या दारू अड्ड्यावर धाड टाकण्यासाठी पोलिस निरीक्षक भगवान खारतोडे आणि इतर सहा कर्मचारी गेले. त्यावेळी वस्तीतील एका अनोळखी इसमाने पीआय खारतोडे यांच्या डोक्यावर लाकडाचा घाव घालून गंभीर जखमी केले. त्यांच्या सोबत असणारे पोलिस कर्मचारी विठ्ठल बंदुके आणि पोलिस नाईक दीपक मेहकर हेही या हल्ल्यात जखमी झाले अशी माहिती प्रत्यक्षदर्शी पोलिस इतर कर्मचाऱ्यानी दिली. पोलिस निरीक्षक खारतोडे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते रक्तबंबाळ झाले. त्यांच्यासह जखमी पोलिसांना तातडीने वेळापूर येथील माने देशमुख हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती कळताच अकलूज पोलिस उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरू यांनी तातडीने रुग्णालयामध्ये धाव घेऊन जखमींची विचारपूस केली. प्रत्यक्षदर्शी कर्मचाऱ्यांकडून घटनेबाबत माहिती घेऊन कर्मचाऱ्यांना तातडीच्या सूचना करून तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. रात्री उशिरा जखमी पीआय खारतोडे यांना पुढील उपचारासाठी अकलूजमधील खासगी रुग्णालयात हलवले असून पुढील तपास सुरु आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: