'अत्यावश्यक' म्हणून बनविण्यात आलेली निम्मी ओळखपत्रे बनावट
म. टा. प्रतिनिधी मुंबई: अत्यावश्यक सेवेतील प्रवासी वगळता अन्य सामान्य प्रवाशांना लोकल बंदी असल्याने बनावट अत्यावश्यक ओळखपत्रांचा काळाबाजार पुन्हा एकदा सुरू झाला आहे. रेल्वे स्थानकात तपासणी होत असलेल्या १०पैकी ५ पास हे बनावट असल्याचे तपासणीत आढळून येत आहे. उपनगरीय रेल्वे प्रवास करण्यासाठी ओळखपत्र दाखवूनच तिकीट-पासची विक्री करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट, दादर, वांद्रे, अंधेरी, डोंबिवली आणि अन्य स्थानकांत रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा दल आणि तिकीट तपासणीसांकडूनही तिकिटांसह अत्यावश्यक ओळखपत्राची तपासणी होते. सध्या तपासणी होत असलेल्या दहा ओळखपत्रांपैकी पाच ओळखपत्र हे बनावट असल्याचे दिसून आले आहे. बनावट ओळखपत्राच्या मदतीने लोकल तिकीट/पासने प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर पोलिसांकडून कारवाई होत आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. वाचा: रेल्वे स्थानकावर तपासणी होत असताना, ओळखपत्रावरील माहिती आणि ओळखपत्रधारकांनी दिलेल्या माहितीमध्ये तफावत आढळते. असे प्रकार किंवा असे वापरणाऱ्या प्रवाशांना रेल्वे सुरक्षा दलाकडून ताब्यात घेण्यात येते. आरपीएफकडे गुन्हा नोंदवून तो गुन्हा रेल्वे पोलिसांकडे वर्ग केला जातो. सध्या बनावट ओळखपत्र धारकांवर रेल्वे कायद्यानुसार कारवाई होत आहे. रेल्वे पोलिसांना अशा प्रवाशांवर कलम ४१३नुसार कारवाई करण्याची मुभा देण्यात आलेली आहे, असे मुंबई लोहमार्ग आयुक्त कैसर खालिद यांनी 'मटा'ला सांगितले. स्मार्ट कार्ड रूपात... मुंबई महापालिका, रुग्णालय, मेडिकल, नर्सरी, एसटी महामंडळ, रेल्वे अशा सर्वच यंत्रणेचे ओळखपत्र तपासणी दरम्यान बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक जण खरेखुरे ओळखपत्र वाटावे यासाठी स्मार्ट कार्ड रूपात ओळखपत्र बनवून घेत आहेत. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: