दीपाली चव्हाण प्रकरणानंतर अमरावती पोलिसांचा महत्त्वाचा निर्णय
जयंत सोनोने । अमरावती वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर महिला आणि बालकांवरील लैंगिक अत्याचारासारख्या घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कायद्याबाबत जनजागृती व्हावी म्हणून अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस दलातर्फे उपक्रम राबविण्यात येत आहे. अत्याचाराचा वेळीच प्रतिकार कसा करावा, कायद्याने महिलांना दिलेले संरक्षण आदींबाबत माहितीपटाच्या माध्यमातून लोकशिक्षण सर्वदूर दिले जात आहे. वाचा: रक्षादीप उपक्रमात लोकशिक्षणासाठी दोन चित्ररथाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात शाळेचा परिसर, आठवडी बाजार, सार्वजनिक ठिकाणी माहितीपटाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. गुन्हेगारी घटना व त्यातून बचावासाठीच्या कृती, कायद्याची माहिती आदी बाबी या माहितीपटातून कथारूपाने सादर केल्या आहेत. महिलांविरुद्ध होणाऱ्या हिंसेत शारीरिक, मानसिक, भावनिक, लैंगिक हिंसा, बळजबरी, कौटुंबिक हिंसाचार, विनयभंग, ॲसिड हल्ला या अत्याचाराविरोधात करावयाच्या कायदेशीर तरतुदींबाबत मार्गदर्शन उपाययोजना माहितीपटात दर्शविण्यात आली आहे. वाचा: महिला व बालकांवर कुठेही अत्याचार किंवा अपप्रकार घडत असल्यास त्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी माहिती अमरावती ग्रामीण पोलीसांच्या हेल्पलाईन क्रमांक १०० किंवा ७५८८२१०००० या क्रमांकावर, दूरध्वनी क्रमांक २६६५०४१ किंवा ७५८८४१०००० या भ्रमणध्वनी क्रमांकावर त्वरित कळवावे, असे आवाहन ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. हरी बालाजी यांनी केले आहे. वेबिनारच्या माध्यमातून १५ हजार विद्यार्थ्यांत जनजागृती कोरोनाकाळात टाळेबंदीमुळे वेबिनारचे माध्यम वापरून जिल्ह्यातील विविध शाळांमधून १५ हजार विद्यार्थ्यांना जनजागृतीपर प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांना विषयाच्या अनुषंगाने प्रश्नसूची देण्यात आली. या प्रश्नसूचीत विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरांची नोंद घेण्यात आली. त्यानंतर त्यांना अनुबोधपट दाखविण्यात आला. त्यात हिंसेचे प्रकार, हिंसेचे बळी ठरत असलेल्या महिलांना कायद्याचे संरक्षण, प्रेमप्रकरणातून घडणारे गुन्हे, ॲसिड हल्ले, बालकांवर होणारे लैंगिक अत्याचाराबाबत माहिती देऊन तीच प्रश्नसूची परत देण्यात आली. विद्यार्थ्याच्या आकलनामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे निदर्शनास आले. या उपक्रमाचा विद्यार्थ्याच्या पालकांचा, शिक्षकवर्ग, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. प्रत्येक ठाण्यात व शाळांमध्येही तक्रार पेटी संबंधितांना तक्रार करण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलीस दलाने प्रत्येक पोलीस ठाण्यात तसेच शाळा व महाविद्यालयांमध्ये तक्रारपेटी उपलब्ध करून दिली आहे. अन्याय, अत्याचाराला तोंड देणाऱ्या, आपल्यासमोर गुन्हेगारी प्रवृत्तीची घटना घडत असल्यास तक्रारपेटीत तक्रार नोंदवावी, अशी माहिती यावेळी वेबिनारमध्ये सहभागी विद्यार्थ्याना देण्यात आली.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: