राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक; लॉकडाऊनबाबत निर्णय होणार?
मुंबईः करोनाचा संसर्ग वाढत असल्यानं मुख्यमंत्री यांनी लॉकडाउनचा इशारा दिला आहे. त्यामुळं येत्या २ दिवसांत लॉकडाउनच्या निर्णयाची घोषणा होईल, अशा चर्चांना उधाण आलं आहे. राज्यातील नागरिकांवर लॉकडाउनची टांगती तलवार असतानाच आज तातडीने राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आली आहे. () मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला होता. तेव्हा त्यांनी लॉकडाउनबाबतचे संकेत दिले होते. तसंच, करोनाला कसं रोखायचं याबाबत तज्ज्ञांशी बोलून निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी काल राज्यातील उद्योगपती, व्यावसायिक यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळं आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आज दुपारी ३ वाजता मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. आज रविवार असूनही बैठक आयोजित केल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तसंच, या बैठकीत करोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्यात येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. तज्ज्ञांसोबत चर्चा करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यावेळी तज्ज्ञांकडून पर्याय जाणून घेतले. वृत्तपत्रांचे मालक, संपादक, वितरक दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत संपर्क साधला. तसंच, व्यायामशाळातील मालक, संचालत, मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली होती. तसंच, सर्वांनी सहकार्य करावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: