अनिल देशमुखांचा राजीनामा; फडणवीसांनी केला 'हा' सवाल
मुंबईः मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या विरोधी पक्ष यांनीही अनिल देशमुखांकडे राजीनामा देण्याशिवाय कोणता पर्याय नव्हता असं म्हटलं आहे. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. 'गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा अपेक्षितच होता. खरं तर तो आधीच व्हायला हवा होता. अनिल देशमुखांकडे राजीनामा देण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता,' असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 'हा राजीनामा झाला असला तरी आजूनही एका गोष्टीचं कोडं मला पडलं आहे. इतक्या भयावह घटना राज्यात घडत आहेत. कधी नव्हे तेवढे आरोप मंत्र्यांवर लागले. मात्र, अजूनही मुख्यमंत्री बोलत नाहीतेय. मुख्यमंत्री शांत आहेत. हे अस्वस्थ करणारं आहे. त्यांची प्रतिक्रिया यायला हवी होती. त्यांची शेवटची प्रतिक्रिया मला आठवतेय. ते म्हणाले होते, की वाझे काय लादेन आहे का?, त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर अजूनही मुख्यमंत्री का बोलत नाहीत, हा माझा सवाल आहे. मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात. मुख्यमंत्र्यांनी लोकांना आश्वस्त करायचं असतं. त्यांनी चूक सुधारु असं सांगणं अपेक्षित,' असं म्हणत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. 'गृहमंत्र्यावर चौकशी होत असेल तर त्या व्यक्तीला त्या पदावर राहता येत नाही. देशमुख यांच्याकडे राजीमाना देण्याशिवाय पर्याय नव्हता, म्हणून त्यांनी राजीनामा दिला. या सरकारमध्ये नैतिकता शिल्लक आहे का हा प्रश्न विचारावा लागेल. याचं कारण म्हणजे, ज्या प्रकारे संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर तसेच आधी पोलिसांचा जो व्यवहार दिसतोय, त्याकडे पाहूनच न्यायालयाने देशमुखांचे प्रकरण हे सीबीआयकडे दिले आहे,' असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: