गडचिरोलीः होळीच्या दिवशी मजुरांवर काळाचा घाला; भीषण अपघातात २ जण ठार
गडचिरोली:-जिल्ह्यातील आष्टी-आलापल्ली मार्गावर चौडमपल्ली जवळ असलेल्या चंदनखेडी फाट्यावर शिवशाही बस आणि पीकअप या दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाल्याने दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत तब्बल १० जण गंभीर असून त्यांना चंद्रपूर आणि गडचिरोली येथे हलविले आहे तर उर्वरित ५ जण किरकोळ जखमी असून त्यांच्यावर आष्टी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार तेलंगाणा राज्यातून मिरची तोडणाऱ्या मजुरांना घेऊन ब्रम्हपुरीकडे जाणारी पिकअप वाहन क्र. टी एस ०४ यु डी ५८४० आणि प्रवाश्यांना घेऊन भंडारा वरून अहेरीकडे येणाऱ्या शिवशाही बस क्र एम एच ४० वाय ५६०१ या दोन वाहनांमध्ये चौडमपल्ली जवळील चंदनखेडी फाट्यावर समोरासमोर धडक झाल्याने पीकअप वाहनाच्या चालकासह एक मजूर जागीच ठार झाल्याची घटना ऐन होळीच्या दिवशी घडली. पिकअप वाहनात एकूण १७ मजूर होते. त्यापैकी दोन जण जागीच ठार झाले तर १० जण गंभीर जखमी असल्याने त्यांना चंद्रपूर आणि गडचिरोलीला नेण्यात आले असून उर्वरित ५ जण किरकोळ जखमी असल्याने ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे उपचार घेत असल्याची माहिती आहे. सदर शिवशाही बस अहेरी डेपोची असून बातमी लिहीत पर्यंत मृतकांची नावे कळू शकली नाही. मात्र,अपघात इतका भीषण होतं की त्यातील १० जण गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर आणि गडचिरोलीला रेफर केल्याची माहिती आहे. उर्वरित पाच जणांवर आष्टी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: