पुण्यात यापुढं फक्त बँकेच्या शाखेजवळच 'एटीएम' सुविधा?
: बँकांच्या शाखांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी असणारी 'एटीएम' केंद्रे () बंद करण्याचा निर्णय बहुतांश बँकांनी घेतला आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. शॉपिंग कॉम्प्लेक्स, रहिवासी इमारती किंवा अन्य ठिकाणी असलेली 'एटीएम' टप्प्याटप्प्याने बंद होत आहेत. यापुढे अन्यत्र असलेली मोजकी 'एटीएम' वगळता बँकेच्या शाखांमध्येच एखाद्या कोपऱ्यात 'एटीएम'ची सुविधा पुरविण्यात येईल, असे चित्र आहे. करोना व लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर बँकांनी खर्चात कपात करण्यास सुरुवात केली. खर्चकपातीच्या धोरणानुसार बँकांच्या शाखांव्यतिरिक्त अन्य ठिकाणची 'एटीएम' (ऑफसाइट ) बंद करण्याचा निर्णय बँकांनी घेतला आहे. पुण्यासारख्या दुसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये प्रामुख्याने या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. मुंबईसारख्या महानगरात शाखांमधील अंतर व जागेचे भाडे लक्षात घेता काही प्रमाणात 'ऑफसाइट एटीएम' सुरू राहणार आहेत. वाचा: 'ऑफसाइट एटीएम'साठी बँकांना मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. यामध्ये जागेचे भाडे, सीसीटीव्ही, सुरक्षा व्यवस्था, वातानूकूलन यंत्रणा, वीजबिल, पर्यायी विद्युतपुरवठा आदी बाबींसाठी खर्च होतो. या तुलनेत 'एटीएम'वरून होणाऱ्या व्यवहारांची संख्या कमी होऊ लागली आहे. सध्या महिन्याला सरासरी तीन ते पाच व्यवहार मोफत असल्याने ९५ टक्क्यांहून अधिक ग्राहक या मर्यादेतच व्यवहार करतात. बँक ग्राहक शक्यतो आपल्याच बँकेच्या 'एटीएम'मध्ये कार्डाचा वापर करीत आहेत. त्यामुळे आंतरबँक व्यवहार शुल्काद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नावरही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे बँकांना 'एटीएम' वापरातून मिळणारे उत्पन्न कमी होऊ लागले आहे, असे एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या सरव्यवस्थापकांनी सांगितले. बँकेच्या खर्चाचा आढावा घेताना विशेषतः बँकेच्या स्वमालकीच्या जागांचा पुरेपूर वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जवळच्या शाखांचे एकत्रीकरणही केले जात आहे. त्यामुळे सध्या ज्या शाखेत 'एटीएम' केंद्र नाही, तिथे 'एटीएम' केंद्र सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे 'एटीएम'साठी भाडे द्यावे लागणार नाही; तसेच इन्व्हर्टर, सुरक्षाव्यवस्था आदी बाबींवर अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही, याकडे अन्य एका बँकेच्या 'एटीएम' ऑपरेशन्स अधिकाऱ्याने लक्ष वेधले. 'एटीएम'चा वापर कमी 'एटीएम' कार्डाचा डेबिट कार्ड म्हणून होणारा वापर वाढत चालला असून, प्रत्यक्ष 'एटीएम' केंद्रात जाऊन पैसे काढण्याचे प्रमाण कमी होत आहे. नोटाबंदी आणि करोनाकाळात नोटांचा वापर कमी होऊन सर्वत्र डिजिटल पेमेंट वाढू लागली. त्यात डेबिट कार्ड वापरासाठीचे शुल्क रद्द झाले, तसेच मोबाइल पेमेंटसह अन्य पर्याय उपलब्ध झाले. त्यामुळे रोख रक्कम न काढता कार्डावरून व्यवहार करण्याचे प्रमाणही वाढत आहे. परिणामी, 'एटीएम' केंद्र चालविणे बँकांसाठी फारसे व्यवहार्य राहिलेले नाही, अशी माहितीही बँक अधिकाऱ्यांनी दिली.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: