मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' विधानावर फडणवीसांचा आक्षेप; केला गंभीर आरोप
मुंबई: राज्यपालांच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यांनी सभागृहात भाषण केले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरेंनी तुफान फटकेबाजी करत विरोधकांवर हल्लाबोल चढवला. तर, मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील मुद्द्यांवर आक्षेप घेते विरोधी पक्ष नेते यांनी जोरदार टीका केली आहे. तसंच, मुख्यमंत्र्यांनी भारतीय सैनिकांचा अपमान केला, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. दिल्लीच्या समेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे या मुद्द्यांवर लक्ष वेधताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मर्गात खिळे आणि चीन दिसला पळे ही भूमिका बदलून या सीमेवर खिळे ठोकले असते तर तो देशात घुसला नसता, असं विधान केलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या या विधानावरुन देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. 'मुख्यमंत्र्यांनी भारतीय सैनिकांचा देखील अपमान केला आहे. चीन समोर आला की पळे, असं जे मुख्यमंत्री म्हणाले, हा भारतीय सैनिकांचा अपमान आहे. ज्या सैनिकांनी उणे ३० डिग्री तापमानात चीनसोबत लढाई करून, भारताची एक इंच भूमी चीनला मिळू दिली नाही आणि चिनी सैनिकांना मागे जावं लागलं. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा एक इंच भूमी देखील चीनला मिळाली नाही, त्या शूर सैनिकांचा जणू काही ते पळपूटे आहेत,' असा घोर अपमान मुख्यमंत्र्यांनी केला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. 'राज्यपालांच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाला जी चर्चा झाली, त्या चर्चेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री उपस्थित होते. पूर्ण तासभर कदाचित ते बोलले, पण या तासभरात ते महाराष्ट्रात येऊच शकले नाही. ते चीनमध्ये गेले, पाकिस्तानात गेले, अमेरिका, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, काश्मीरसह दक्षिणेतही गेले. पण महाराष्ट्राबद्दल मात्र त्या संपूर्ण तासभरात एक वाक्य देखील ते बोलू शकले नाहीत,' अशी टीकाही त्यांनी केली आहे. 'खरंतर मुख्यमंत्र्यांना आता भरपूर दिवस झाले, पूर्वी ते नवीन होते. आता ते नवीन नाहीत, पण चौकातलं भाषण आणि सभागृहातलं भाषण यातलं अंतर हे मुख्यमंत्र्यांना अद्यापही लक्षात आलेलं नाही. सभागृहात उपस्थित झालेल्या मुद्यांवर बोलावं लागतं, राज्याच्या प्रश्नांवर बोलावं लागतं. दुर्देवाने शेतकऱ्यांच्या संदर्भात एक मुद्दा देखील ते मांडू शकले नाहीत', असा घणाघातही त्यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांचं नवीन रुप आज पाहायला मिळालं 'मुख्यमंत्री अमित शहांबद्दल बोलले ते उसने आवसान आहे. त्यांना कोणताही शब्द दिलेला नव्हता. खोटं बोल पण रेटून बोल, हे मुख्यमंत्र्यांचं नवीन रुप आज पाहायला मिळालं, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: