'त्या' घोटाळ्यातील अधिकाऱ्यांचे निलंबन; धनंजय मुंडेंची मोठी घोषणा
मुंबई: बार्टी’च्या अधीनस्थ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान संस्थेमध्ये आर्थिक गैरव्यवहार आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याचे पडसाद आज विधानसभा सभागृहातही उमटल्याचं पाहायला मिळालं. या गैरव्यवहार प्रकरणी सामाजिक न्याय मंत्री यांनी गैरव्यवहाराला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. समता प्रतिष्ठानमधील गैरव्यवहारावरुन विधानसभेत धनंजय मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणी धनजंय मुंडे यांना कोंडीत पकण्याचा प्रयत्न केला आहे. तर, या गैरव्यवहारात सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांची नावं उघडं करा व त्यांच्यावर आजच्या आज कारवाई करा, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी उचलून धरली होती. नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानमध्ये गैरव्यवहाराला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांची नावं धनंजय मुंडे यांनी जाहीर केली आहेत. तसंच, भ्रष्टाचार प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. या संस्थांतील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यासाठी SIT नेमण्याची घोषणाही मुंडे यांनी केली आहे. तसंच संबंधित अधिकारी यांचे राजकीय हितसंबंध शोधावेत व त्यांच्यावर देखील कार्यवाही व्हावी, असंही त्यांनी म्हटलं आहे. मागील सरकारच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबविण्याच्या अनुषंगाने सामाजिक न्याय विभाग व बार्टी मार्फत नागपूर येथील समता प्रतिष्ठान या संस्थेची नेमणूक करत त्या संस्थेस १६ कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला होता. या निधीचा अपव्यय करत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. सदर उपक्रमाचा आर्थिक लेखा परीक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातून पावत्याशिवाय व संचालक मंडळाच्या परवानगी शिवाय निधी खर्च केल्याच्या अनेक गैर बाबी उघड झाल्या, असं मुंडे यांनी सांगितलं.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: