टीआरपी घोटाळा: मुंबई पोलिसांचा अर्णव गोस्वामीवर नवा आरोप
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई 'टीआरपी घोटाळ्याचा तपास अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. वाहिन्यांचा टीआरपी कृत्रिमरीत्या वाढवण्यासाठी बार्कमधील अधिकाऱ्यांनी काहींशी संगनमत केल्याचे आतापर्यंतच्या तपासातून उघड झाले आहे. अशावेळी एआरजी कंपनी आणि () हे आपल्या आणि रिपब्लिक भारत या वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून मुंबई पोलिस () दलाविषयी अपप्रचार करून आणि याचिका करून तपासात खोडा घालण्याचाच प्रयत्न करत आहेत', असा आरोप मुंबई पोलिसांनी आपल्या प्रतिज्ञापत्राद्वारे मुंबई उच्च न्यायालयात केला आहे. तसेच गोस्वामी व कंपनीची याचिका त्यांना दंड लावून फेटाळावी, अशी विनंतीही पोलिसांनी केली आहे. घोटाळ्याचा तपास केवळ आम्हाला लक्ष्य करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप करत एआरजी आऊटलायर कंपनीने आणि या कंपनीच्या रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांनी केली आहेत. तसेच हा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे द्यावा, अशा विनंतीसह अनेक अर्जही केले आहेत. त्याला मुंबई पोलिस दलाने काही दिवसांपूर्वी प्रतिज्ञापत्रांद्वारे आपले उत्तर दाखल केले. 'या प्रकरणाच्या तपासादरम्यान व्हॉट्सअॅपवरील संभाषण हाती लागले आहेत. त्यातून काही आरोपींविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटल्याप्रमाणे जो झाला आहे त्याचा तपास आणखी सुरू राहण्याची आवश्यकता स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे कंपनीच्या या याचिकेच्या माध्यमातून तो तपास थांबू नये. केवळ याचिकादारांनाच पोलिस लक्ष्य करत आहेत, या आरोपांत कोणतेही तथ्य नाही. पोलिसांकडून अन्य वाहिन्यांच्या भूमिकेविषयीही तपास सुरू आहे. आजच्या घडीला इंडिया टुडे वाहिनीचा यात संबंध असल्याचे दाखविणारे पुरावे हाती लागलेले नाहीत. मात्र, पोलिसांनी या वाहिनीसह अन्य अनेक वाहिन्यांविषयी तपास सुरू आहे. याचिकादार कंपनीने हा तपास अन्य तपास यंत्रणेकडे हस्तांतर करण्याची विनंती केली असली तरी आरोपींना अशी विनंती करण्याचा अधिकारच नाही. तपास अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर असताना अडथळा आणण्याचे याचिकादारांचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे ही याचिकाच दंड लावून फेटाळण्यात यावी', असे म्हणणे सीआयडी, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त शशांक सांडभोर यांनी प्रतिज्ञापत्रात मांडले आहे. 'वाहिन्यांचा गैरवापर' 'या प्रकरणात याचिकादार कंपनीकडून आपल्या वृत्तवाहिन्यांचा वापर हा केवळ मुंबई पोलिस दलाविरोधात सूड उगवण्यासाठी होत आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू व पालघर झुंड बळी यांचा काहीच संबंध नसताना तो जोडून जाणीवपूर्वक हा तपास राजकीय हेतूने असल्याचे याचिकादारांकडून वारंवार दाखवले जात आहे. उघडपणे मीडिया ट्रायल करून आणि या प्रकरणात स्वत:च्याच कंपनीला क्लीन चीट देऊन मुंबई पोलिस दलाची बदनामी करण्याचे उद्योग याचिकादार करत आहेत. यामुळे निष्पक्ष तपासातच अडथळे निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत', असे म्हणणे मुंबई पोलिसांनी मांडले आहे. 'ती पत्रकार परिषद प्रथेप्रमाणेच' मुंबई पोलिस आयुक्त परमबिर सिंग यांनी जाणीवपूर्वक आम्हाला लक्ष्य करण्याच्या हेतूने कथित टीआरपी घोटाळा उजेडात आल्यावर पत्रकार परिषद घेतली, असा आरोप एआरजी कंपनीने केला आहे. त्याविषयी उत्तर देताना, संवदेनशील प्रकरणांच्या तपासाविषयी पूर्वीपासून असलेल्या प्रथेप्रमाणेच आपण पत्रकार परिषद घेतली, असे सिंग यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: