भाजपचे ७ नगरसेवक नॉट रिचेबल; राष्ट्रवादीनं टाकलं जाळं
सांगली: सांगली महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक मंगळवारी (ता. २३) होणार आहे. महापालिकेतील सत्ता काबीज करण्यासाठी सत्ताधारी भाजपसह विरोधी काँग्रेस आघाडीकडून फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. सत्ताधारी भाजपमधील काही नाराज नगरसेवक विरोधी पक्षांच्या वाटेवर असल्याने भाजपच्या नेत्यांची अस्वस्थता वाढली आहे. भाजपचे सात नगरसेवक नॉट रिचेबल असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना आपल्या गटात ओढण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. दरम्यान, काँग्रेसच्या ७ नगरसेवकांनीही महापौर पदासाठी दबावगट तयार केल्याने आघाडीची धाकधूक वाढली आहे. निर्णायक संख्याबळाच्या दोलायमान स्थितीमुळे सांगली महापालिकेच्या महापौर, उमहापौर पदाच्या निवडीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. (Sangli Mayor, Deputy Mayor Election) वाचा: सांगली महापालिकेत ४३ नगरसेवकांच्या बळावर गेली अडीच वर्षे भाजपची सत्ता आहे. महिला राखीव पदाचा कार्यकाळ संपल्याने पुढील अडीच वर्षांसाठी महापौर आणि उमहापौर पदाची निवडणूक मंगळवारी विशेष ऑनलाइन सभेद्वारे होणार आहे. अर्ज भरताच भाजपचे नगरसेवक संपर्काबाहेर गेले आहेत. हे नगरसेवक काँग्रेस आघाडीच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. यामुळ सध्या काँग्रेस आघाडीकडे ३९, तर भाजपकडे ३६ नगरसेवक असून, दोन नगरसेवकांची भूमिका अद्यापही स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे सोमवारचा दिवस निर्णायक ठरणार आहे. वाचा: महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक चुरशीची होत आहे. महापालिकेत भाजपचे बहुमत असून ४३ संख्याबळ होते. पण गेल्या अडीच वर्षात भाजपमधील नगरसेवकांत असंतोष निर्माण झाला होता. त्याचा नेमका फायदा राष्ट्रवादी काँग्रेसने उचलला आहे. राज्यातील सत्तेचा पुरेपूर फायदा घेत राष्ट्रवादीने भाजपच्या १२ नगरसेवकांना गळाला लावले होते. उमेदवारी अर्ज दाखल होताच हे नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. त्यातील तिघांना रोखण्यात यश आले, तर आणखी दोघेजण स्वगृही परतले आहेत. अजूनही सात नगरसेवक गायब आहेत. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे भाजपचे संख्याबळ ३६ वर आले आहे. वाचा: दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीत महापौर पदाच्या उमेदवारीचा फैसला झालेला नाही. काँग्रेसच्या नऊ नगरसेवकांनी महापौर पदासाठी दबावगट तयार केला आहे. हे नगरसेवक स्वतंत्ररित्या सहलीवर गेले आहेत. महापौरपद काँग्रेसलाच मिळावे, अशी त्यांची मागणी आहे. या नगरसेवकांना आपल्या बाजूला खेचण्यासाठी भाजपनेही फिल्डिंग लावली आहे. मात्र त्याला अजून यश आलेले नाही. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतेही अस्वस्थ आहेत. सध्या आघाडीकडे ३९ नगरसेवक असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे महापालिकेत सत्ता परिवर्तन होणार, की सत्ता राखण्यात भाजपला यश येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तिन्ही पक्षांचे उमेदवारी अर्ज महापौर पदासाठी आघाडीकडून मैनुद्दीन बागवान आणि दिग्विजय सूर्यवंशी यांचे अर्ज दाखल झाले आहेत. उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे उमेश पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सविता मोहिते, स्वाती पारधी यांनी अर्ज भरले आहेत. भाजपकडून धीरज सूर्यवंशी यांचा महापौर पदासाठी, तर गजानन मगदूम यांचा उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल झाला आहे. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: