मोठी बातमी! १ फेब्रुवारीपासून सर्वांना लोकल प्रवास करता येणार
मुंबई: करोनाच्या संकटामुळं सुमारे दहा महिन्यांपूर्वी बंद झालेली व त्यानंतर मर्यादित प्रवाशांसाठी सुरू असलेली मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा येत्या १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुली होणार आहे. मात्र, प्रवासाच्या वेळा मर्यादित असणार आहेत. तसं पत्र राज्य सरकारनं मध्य व पश्चिम रेल्वेला लिहिलं आहे. त्यामुळं मुंबईसह आसपासच्या शहरांत राहणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. ( For All) राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्या सहीने आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागानं हे पत्र लिहिलं आहे. त्याद्वारे सर्वांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याची सूचना मध्य व पश्चिम रेल्वेला करण्यात आली आहे. रेल्वेला ही सूचना करतानाच मुंबईकरांच्या सोयीसाठी व उपनगरातील विविध कार्यालये व आस्थापना यांनी कामाच्या वेळांमध्ये सुधारणा करावी, असं आवाहनही सरकारनं केलं आहे. वाचा: विशिष्ट वेळांच्या मर्यादेत मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरू करण्यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे बैठक झाली होती. यात वरिष्ठ रेल्वे अधिकारी देखील उपस्थित होते. सर्व प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरू करताना गर्दी होणार नाही व आरोग्याचे नियम पाळले जातील याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार कोणत्या वेळेत सर्वसामान्यांना प्रवासाची परवानगी देता येईल, हे देखील सरकारनं रेल्वेला कळवलं आहे. या पत्रानुसार सर्वसामान्य प्रवाशांसाठी खालीलप्रमाणे ही सेवा उपलब्ध असणार आहे: कधी प्रवास करता येईल: सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत तसेच दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल. कधी प्रवास करता येणार नाही: सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवांत प्रवास करता येणार नाही. या वेळात फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकतील. उपहारगृहे व दुकानांसाठी वेळा मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रातील दुकाने व आस्थापना रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येतील तसेच उपहारगृहे रात्री १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येतील. दुकानांसाठी कमाल कर्मचाऱ्यांची ३० टक्के उपस्थितीची अट तसेच उपहारगृहे, फूड कोर्ट यासाठी वेळोवेळी निर्गमित एसओपीप्रमाणे अंमलबजावणी राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: