औरंगाबादच्या नामांतरावरुन महाविकास आघाडीत बिघाडी?; शिवसेनेनं दिलं 'हे' उत्तर

January 02, 2021 0 Comments

मुंबईः 'सरकारी कागदावर नसेलही, पण राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री असतानाच प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर करुन टाकले व जनतेने ते स्वीकारले. त्यामुळं आता संभाजीनगरमुळं महाविकास आघाडीत काही बिघाडी होईल, असे कोणाला वाटत असेल तर ते ठार वेडे आहेत,' असं स्पष्ट करतानाच शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे. औरंगाबाद शहराच्या नामांतरणाच्या प्रकरणामुळं राज्यातील वातावरण तापले आहे. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यास काँग्रेसनं विरोध केला आहे. काँग्रेसच्या विरोधानंतर राज्यातील विरोधी पक्ष भाजपनं पुन्हा महाविकास आघाडीतील अंतर्गंत वादावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. भाजपनं केलेल्या या टीकेवर शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून नामांतराबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. 'औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्यास काँग्रेसनं विरोध केला आहे. यावर भाजपास गलिच्छ उकळ्या फुटल्या आहेत. काँग्रेसचा हा विरोध आजचा नाही. जुनाच आहे. त्यामुळं महाविकास आघाडीच्या ध्येयधोरणांशी त्याचा संबंध जोडणे मूर्खपणाचे आहे,' असं स्पष्टीकरण शिवसेनेनं दिलं आहे. 'राज्याचे महसूल मंत्री व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबाद शहराचे नामांतर करण्याचा कोणताही प्रस्ताव महाविकास आघाडीच्या समितीसमोर आल्यानंतर त्याला काँग्रेसचा विरोधच असेल, हा दावा त्यांनी केला. यावर भारतीय जनता पक्षाला हिंदुत्वाचा घोर लागला आहे. आता शिवसेना काय करणार? असा प्रश्न चंद्रकांत पाटील वगैरे लोकांनी विचारला आहे. औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्यासाठी शिवसेना आतापर्यंत आग्रही राहिली आहे. आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसने नामांतरास विरोध केल्याने शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी, असा भाजपचा आग्रह आहे. त्यात भूमिका स्पष्ट करण्याचसारखं काहीच नाही, असे म्हणत शिवसेनेने आपली भूमिका बदललेलीच नसल्याचं तसेच ‘बाळासाहेब ठाकरे यांनी तीस वर्षांपूर्वीच जाहीरपणे औरंगाबादचे संभाजीनगर केले आहे. राहिला प्रश्न कागदपत्रांचा त्यावरही लवकरच दुरुस्ती होईल, असा ठाम विश्वास शिवसेनेनं व्यक्त केला आहे. अग्रलेखातील ठळक मुद्दे अलाहाबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या होऊ शकते, दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम रस्ता असे नामांतर होऊ शकते, तर औरंगाबादचे संभाजीनगर का होऊ शकत नाही? असा बिनतोड सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. पण पाटलांच्या या बिनतोड सवालास पूरक म्हणून आम्ही त्यांना एक मुंहतोड जवाब विचारू इच्छितो की, अलाहाबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या केले, दिल्लीच्या औरंगजेब रस्त्याचे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम केले त्याच वेळी महाराष्ट्रातील औरंगाबादचे संभाजीनगर करून तुम्ही का मोकळे झाला नाहीत? बाळासाहेब थोरात म्हणतात ते बरोबरच आहे. महाराष्ट्राचे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीशी बांधील आहेच. अन्न, वस्त्र, निवारा, पददलितांना न्याय, शेतकरी, कष्टकऱ्यांना बळ देण्याचा हा कार्यक्रम आहेच. तरीही कोणत्याही राज्याला धर्माचे व सरकारला स्वाभिमानाचे अधिष्ठान हवेच! औरंगजेब हा काही महाराष्ट्र धर्म किंवा स्वाभिमानाचे प्रतीक नाही. हे काँग्रेसवालेही मान्य करतील व औरंग्या हा काही सेक्युलरही नव्हता, हे समजून घेतले पाहिजे. भाजपावाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये. पाकिस्तानात हिंदू मंदिरांची तोडफोड सुरू आहे. तेथे एखादा सर्जिकल स्ट्राइकचा फुगा फोडता येईल काय ते पाहावे!


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: